मोठी बातमी.! भूविकास बँकेची मालमत्ता होणार सरकारजमा, तर ३५ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ?

मोठी बातमी.! भूविकास बँकेची मालमत्ता होणार सरकारजमा, तर ३५ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ?

NEWS15 प्रतिनिधी : मुंबई

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे शेतीकर्ज देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास बँक) मागील काही वर्षांपासून तोट्यात असल्याने;  या बँकेची सर्व मालमत्ता सरकार जमा कातून,  राज्यातील भूविकास बँकेच्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकित कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; या बँकेची राज्य स्तरावर शिखर बँक तर प्रत्येक जिल्हयात भूविकास बँका, ३० उपशाखा होत्या. सुरूवातीच्या काळात शेतक-यांसाठी वरदान ठरलेल्या या बँकेचे १९९८ पासून कर्ज वितरण बंद झाल्यापासून ही बँक अडचणीत आली. परिणामी सन २००२ मध्ये या बँका अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. सन २००८ मध्ये वैद्यनाथन समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने लाभ मिळवून या बँकांचे पुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र.! त्यानंतरही या बँका वाचविण्यात यश न आल्याने; अखेर सन २०१३ मध्ये या बँका अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. बँकेच्या कर्मचान्यांची २७५ कोटींची थकबाकीही एकरकमी देण्यात येणार आहे. तसेच बँकेच्या विविध जिल्ह्यातील ५५ मालमत्ता सरकार ताब्यात घेणार असून, त्यातील काही इमारती सहकार विभागाला तर काही जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहेत.

त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला भूविकास बँकेचा विषय अखेर मार्गी लागला असून, येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. उपसिमतीच्या अहवालानुसार या बँकेच्या ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तारण दिलेल्या जमिनी आता मुक्त होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार.