सोलापूर जिल्हा परिषद वादग्रस्त कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची अखेर बदली...
![सोलापूर जिल्हा परिषद वादग्रस्त कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची अखेर बदली...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e20b867ede4.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रविण मखरे
सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची शासनाने अखेर उचलबांगडी केली असून, त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद येथे बदली केली आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला हजारो कोटीचा निधी मिळाला. या कामांच्या टेंडरमध्ये कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी अनियमितपणा असल्याच्या तक्रारी; आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या होत्या. त्यावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोळी यांची चौकशी लावली होती. त्या चौकशीच्या अहवालात जनजीवन मिशन योजनेच्या कामात टेंडर देताना अनियमितपणा आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे पाठवला होता. एक महिन्याच्या आतच कोळी यांची शासनाने बदली केली आहे.
कोळी यांच्या बदल्यात दुसरा अधिकारी दिला नसला तरी आता हा चार्ज कुणाकडे जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंडड यांनी यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. त्यामुळे नवीन अधिकारी येईपर्यंत तो चार्ज कटकधोंड यांच्याकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दीपक कोळी यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. जलजीवन मिशनचे टेंडर देताना त्यांनी बराच गोंधळ घातला. टक्केवारी वसुलीसाठी त्यांनी स्वतंत्र खाजगी व्यक्ती नेमण्याची चर्चा झेडपी मधून ऐकण्यास मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा त्यांच्या कारभारावर मागील काही दिवसात प्रचंड नाराज दिसून आले.