यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन...
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही मार्गदर्शक– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. १२ मार्च २०२६ : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री आणि आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचे स्मरण केले.
याबाबत बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे लोकनेते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले यशवंतराव चव्हाण यांनी समाजातील वंचित घटकांना अधिक अधिकार आणि संधी मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचारातून त्यांनी दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याचा ध्यास घेतला.
त्या पुढे म्हणाल्या की, राजकारणाबरोबरच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्राशीही यशवंतराव चव्हाण यांचा सातत्याने संवाद होता. ते कलारसिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पत्नी रेणूताई चव्हाण यांनाही वाचनाची विशेष आवड होती.
साताऱ्यातील ‘विरंगुळा’ हे त्यांचे निवासस्थान आज स्मृतीस्थान म्हणून जतन करण्यात आले असून तेथील समृद्ध ग्रंथसंपदा त्यांच्या वैचारिक परंपरेची साक्ष देते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर यशवंतराव चव्हाण यांचा ठसा आजही कायम असून विधानमंडळात त्यांना आदरांजली अर्पण करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.