चिंचवड.! आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन...
News15 प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची शोकमय बातमी समोर आली आहे. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील बाणेर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.
पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.
१९९३-९४ मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.
मागील महिन्यातच भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यातच आज लक्ष्मण जगताप यांनी देखील आखेरचा श्वास घेतला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने चिंचवड भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर व कार्यकर्त्यांवर अक्षरशः दुःखाचा डोगर कोसळला आहे.