5 हजार सरकारी शाळा दत्तक देणार, तर सरकारी शाळेला देणगीदाराचे नाव.! शिक्षणमंत्र्यांचा निर्णय?
NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या स्थितीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने राज्यातील एका नामांकित उद्योगसमूहाने ५ हजार शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील 5 हजार शाळा ह्या दत्तक देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोणत्याही शाळेचे खासगीकरण केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामीण व शहरी भागांतील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी 'दत्तक शाळा योजना' राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक कंपन्याकडून देणगी घेऊन शाळांतील पायाभूत सुविधांची दर्जावाढ केली जाणार आहे. यामध्ये शाळांच्या इमारतींची डागडुजी, क्रीडा साहित्य, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिज्युअल लॅब, इंग्लिश लॅब, रोबोटिक लॅब आदी सुविधा देणगीदारांकडून पुरविल्या जाणार आहेत. शाळांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना ही मदत दिली जाईल. या देणगीदारांना पाच ते दहा वर्षांच्या करारावर शाळा दत्तक दिली जाणार आहे. त्या बदल्यात शाळांना देणगीदारांचे नाव दिले जाणार आहे.
राज्यात सध्या ७५ हजार शाळा असून, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रस्तरावर एका शाळेचा कायापालट शक्य आहे असे केसरकर यांनी म्हंटले. 'दत्तक शाळा योजनेमध्ये मोठ मोठे उद्योगसमूह सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करून देणार आहेत. या योजनेतून शाळांचे खासगीकरण करण्यात येणार नाही. शाळांमधील पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करण्याचा उद्देश आहे असेही केसरकर यांनी सांगितले. खासगी उद्योगसमूह दरवर्षी कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च करतात. मात्र त्याचा योग्य वापर होत नाही. यामाध्यमातून थेट शाळांच्या विकासासाठी उद्योगांचा निधी वापरता येणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
योजनांचा मंगळवारी शुभारंभ होणार...
राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा २ या उपक्रमांचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ५ डिसेंबरला करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी यावेळी जाहीर केले.