लाच घेताना उपजिल्हाधिकारी अटक.! 50 हजाराची लाच घेताना ACB ची कारवाई...
सर्वसामान्य नागरिकांच एखाद काम करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी सरास लाचेची मागणी करतात.! आणि ह्याच लालचेपोटी अनेकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात.! एखादा छोटासा अधिकारी लाच मागताना आपण आजवर ऐकल आहे किंवा त्यांच्यावर कारवाई होतानाही आपण पाहिला असेल.
परंतु जर; जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च स्थान आणि जबाबदार अधिकारीही असे करत असेल तर मग काय.! असच प्रकरण पालघर जिल्हा प्रशासनातून समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर हे एका जमीन प्रकरणात 50 हजार रुपयाची लाच घेताना सापडले आहेत. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं असून, त्यांना अटक करण्यात आलीय.
मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना अटक केली. पालघरमधून संजीव जाधवर यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि संजीव जाधवर यांची बदली झाली असतानाही त्यांनी पदभार सोडला नव्हता अशी माहिती समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे 50 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर संजीव जाधवर आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली.
या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली असून, या प्रकरणात अजून कोण सहभागी आहेत का हे तपासले जाण्याची शक्यता आहे.