ही शेवटची लढाई आंदोलनात सक्रिय भाग घ्यावा - मनोज जरांगे पाटील
![ही शेवटची लढाई आंदोलनात सक्रिय भाग घ्यावा - मनोज जरांगे पाटील](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c4ff574a3d2.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हान, नाशिक
दिंडोरी : मराठा आंदोलनामुळे सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेत लाखो नोंदी मिळाल्या असून, त्यामुळे दीड करोड कुणबी दाखले मिळणार आहेत. सगेसोयरे चा अध्यादेश काढला असून, तो पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविले जाणार आहे. तर त्यास पाठींबा देण्यासाठी आपल्या आमदार / खासदारांवर दबाव आणत सर्व समाजाने पक्षनेते विसरून समाजासाठी एकत्र येत आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन; संघर्ष योध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केले.
आज गुरुवार दि. ८ रोजी दिंडोरी येथे झालेल्या जंगी स्वागता प्रसंगी जरांगे पाटील बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकरणारे संघर्ष योध्ये जरांगे पाटील हे सप्तशृंग गडावर जात असताना दिंडोरी शहरात त्यांचे सकल मराठा समाजाच्यावतीने जंगी स्वागत करून भव्य रॅली काढण्यात आली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, यांनी आज पर्यंत अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्याने तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आंदोलनामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा होत नोंदी सापडत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळत आहे. ज्यांच्या नोंदी नाही त्यांनाही सगे सोयरे च्या कायद्याने आरक्षण मिळणार आहे त्यासाठी शासनाने अध्यादेश काढला असून, विशेष अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात सदर कायदा पारित व्हावा यासाठी सर्व मराठ्यांनी आपल्या आमदार मंत्र्यांना सांगून कायद्याला पाठींबा द्यायला सांगा जे पाठिंबा देणार नाही त्यांना मराठा समाजाचा हिसका दाखवा असे सांगत आपण हा कायदा पारित होण्यासाठी उपोषण करणार असून ही शेवटची लढाई आहे यात सर्वांनी सहभागी व्हा आपापल्या गावात शांततेने कायदेशीर आंदोलन करा.
कुणी कितीही विरोध केला तरी आपण आरक्षण घेणारच असे जरांगे पाटील यांनी सांगितले. पाटील यांचे पिंपळणारे फाटा, खतवड फाटा, अक्राळे फाटा, दिंडोरी, वलखेड फाटा, लखमापुर फाटा, वनी येथे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी सप्तशृंगी गड येथे जात आई सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन मार्गक्रमण केले. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.